Tuesday, April 5, 2011

भारतीय संघाचे अभिनंदन

विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन !

Thursday, March 31, 2011

भारतीय संघाचे अभिनंदन ! हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा !

  पाकिस्तानी संघाला धूळ चारीत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !
   धोनीमहाशयांचे नशीब जोरावर आहे यात शंकाच नाही. हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा ! अत्यंत दबावाखाली भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. सेहवागने मारलेले चौकार प्रेक्षणीय.  सचिन आणि रैनाच्या फलंदाजीमुळे २६० चा स्कोर उभारता आला. रैना चिवट आहे. आस्ट्रेलिया विरुद्ध आणि आता पाकविरुद्ध शेवटपर्यंत तो टिकला. युवराज आणि हरभजन यांनी वेळेवर विकेट घेतल्या. नेहराने चांगली बोलिंग केली. आपली बोलिंग अचूक होती. पाकच्या मानाने आपण वाईड, नोबॉल कमी दिले. इथेच फरक स्पष्ट झाला. 
  आपले क्षेत्ररक्षण उत्तम झाले. आपला अंतिम सामना श्रीलंकेशी आहे. दिलशान, संगक्कारा यांना लवकर आउट केले, मलिंगा, मुरली यांना शरण गेलो नाही तर विश्वचषक आपलाच. 
  पुन्हा भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा !

Wednesday, February 2, 2011

पेढ्यांचे वेडे

       लहानपणापासून आम्ही तसे पेढ्यांचे वेडेच ! मूळ गाव चांदवड असल्याने तसे असेल कदाचित. आमच्या चांदवडचे पेढे अतिशय प्रसिध्द ! चांदवड तालुक्यात शुद्ध, खात्रीशीर खवा मिळतो. विशेषत: वडनेर भैरव, धोडांबे (धोडप किल्ल्यासाठी प्रसिध्द गाव), हट्टी येथील खवा अतिशय प्रसिध्द. अस्सल खव्याचा जाणकार तर हट्टीचा (गावाचे नाव) खवा आवर्जून नेतो. चांदवडचे पेढे खमंगपणासाठी प्रसिद्ध. ताज्या, कच्च्या मलईचा पेढा तर कोणीही बनवेल. मलईपेक्षाही खव्याचा पेढा बनविण्यात चांदवडकर पटाईत. खवा आणून लाल होईपर्यंत खमंग भाजायचा. त्यात प्रमाणशीर साखर टाकायची. नंतर पेढे वळायचे. असे हे पेढे नुसतेच गोड नाही तर मधुर लागतात. पूर्वीच्या काळी तर साखरेऐवजी गूळ वापरायचे. त्या खमंगपणाला तर जगात तोड नव्हती. हा पेढा भाजलेला असल्यामुळे मलई पेढ्यापेक्षा खूप जास्त टिकतो.   चांदवडचे बाजारवेशीतले  लिन्गायाताकडचे, हायवेवरचे भैरवनाथाकडचे पेढे अतिशय प्रसिद्ध. तर मंडळी, कधी चांदवडमार्गे  गेलात तर अवश्य पेढे घ्या. 
        आमच्या चांदवडसारखीच थोडीशी चव मिळाली ती परतवाड्याच्या पेढ्यांची. जवळ जवळ शंभर ते दीडशे ग्रामचा एकच पेढा असावा. एक पेढा खाल्ला तरी पोट भरते. उपवासाला दुसरा फराळ करायची गरज नाही. हा ही भाजलेला असतो. 
       नाशिकचे मलई पेढे प्रसिध्द. पण वरच्या दोन्ही पेढ्यांची सर नाही. 
       साताऱ्याचे कंदी पेढे तर थेट पुण्याशीच नाते सांगतात. पेढा खाल्ला आहे की नाही अशी शंका यावी इतका छोटा आकार. 
       मंडळी तुमचा पेढ्याचा काय अनुभव ?

Monday, January 17, 2011

महाराष्ट्रात स्वर्ग ?

महाराष्ट्रात स्वर्ग ? 
होय महाराजा. कोंकण हा महाराष्ट्रातील स्वर्गच नव्हे का? 
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनस्पतींची विपुल उपलब्धी कोंकणात आहे. सर्वात जास्त बायो डायव्हर्सिटी, जैव विविधता कोंकणात आहे. विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. कोंकण निसर्गसमृद्धतेने नटलेला आहे.
कोकणाने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला नररत्ने दिली आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. 
आता तर कोकणात जमिनीत सोने सापडले आहे. समुद्रात तर मोती आहेतच. 
आहे की नाही कोकण हा महाराष्ट्रातील स्वर्ग ?

Wednesday, January 5, 2011

हंगामी भक्ती

        आपले देव जसे हंगामी, उत्सव हंगामी, तशी आपली भक्तीही हंगामी असते. गणपतीचे दिवस आले की आपण गणरायाच्या भक्तीत बुडून जातो. नवरात्र आले की देवीपुढे रांगा लागतात. चंपाषष्ठीला आपल्याला खंडोबाची आठवण येते. रामनवमीला रामाची तर जन्माष्टमीला कृष्णाची आरती करण्यात मग्न असतो. अशी हंगामी भक्ती केल्याने ते ते देव प्रसन्न होतील अशी आपली समजूत (गैर) असते. त्या त्या देवांच्या उत्सवात त्या मंदीरांमध्ये एवढी गर्दी लोटलेली असते की ढकला-ढकलीत देवांचे दर्शनही होणे मुश्कील.
       ज्यांना खरोखरीच देवाचे मनापासून दर्शन घ्यावयाचे आहे, त्याचे रूप भक्तीने न्याहाळायचे आहे त्यांनी शांततेत, गर्दी नसताना दर्शन घ्यावे. रामनवमीला कृष्णाचे अगदी शांततेत दर्शन होते. जन्माष्टमीला गणरायाच्या मंदीरात कितीही वेळ बसले तरी कोणी हटकणार नाही. गणेशोत्सवात देवीच्या मंदीरात भरपूर आराधना करता येईल.
      शांत, निवांतपणे आणि आनंदाने अशी ही ऑफ सिझन दर्शनाची सूट मिळते. आपल्याला अशी सूट पाहिजे का ?